Friday, July 27, 2018

२६ जूलै १९९९ कारगिल विजय दिवस

२६ जूलै १९९९:-

२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी दि. २६ जुलै रोजी *‘कारगिल विजय दिन’* साजरा केला जातो.

कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर या युद्धामध्ये पराक्रमाची बाजी लावून विजय पताका फडकविणा-या सैनिकांचे स्मरण करणे औचित्याचे ठरते. अत्यंत खडतर परिस्थितीत जीवाची पर्वा न करता, ज्या सैनिकांनी देशाच्या सुरक्षिततेला अबाधित ठेवले, त्यांच्या शौर्यापुढे नतमस्तक होऊन भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना, आपणदेखील तेवढेच तत्पर राहिले पाहिजे, ही जाणीव या निमित्ताने सर्वांच्या मनात रुजवली गेली पाहिजे.

"दि. २६ जुलै कारगिल विजय दिन"
या युद्धाची वीरगाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात तेवढीच जिवंत आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान मे १९९९ मध्ये कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरांच्या रूपात आले, त्यानंतर त्यांनी अनेक भारतीय शिखरांवर कब्जा केला. पाकिस्तानी लष्कराला भारतीय भूमीवरून हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. यात भारतीय लष्कराचे सुमारे ३० हजार जवान सहभागी झाले. दि. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी ‘कारगिल विजय दिन’ साजरा केला जातो.

   जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी ‘कारगिल युद्ध’ एक ताजे उदाहरण आहे. सुरुवातील पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांचे केवळ ३७५ जवान ठार झाले आहेत, परंतु नंतर स्पष्ट झाले की, पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. १३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.

द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून, तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत, ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो.

No comments:

Post a Comment