Sunday, February 5, 2012

गड आला पण सिंह गेला......४ फेब्रुवारी १६७०

 ।।श्री शिवरायाय नमः ।।
४ फेब्रुवारी आजच्याच दिवशी १६७० साली नरवीर "तान्हाजी मालुसरे" लढता लढता धारातीर्थी पडले पण सिंहगडावर भगवा फडकावूनच ...
नरवीर तानाजींना मानाचा मुजरा ...!!!



त्या दिवशी वारे बरेच वाहत होते. देवासामोरील वात फरफरत तेवत होती, जिजाऊ आपल्या बिछान्यावर पहुडलेल्या. शिवबा त्यांचे पाय रगडित होते . जिजाऊंची नजर आपल्या खिडकीतून समोर गेली . आणी त्या ताडकन उठून खिडकीजवळ उभ्या ठाकल्या मागोमाग राजे होतेच
" काय झाले आऊ साहेब"
"शिवबा, शिवबा मोघली ध्वज मिरवणारा कोंडाणा आमच्या डोळ्यात खूप दिवस सलत आहे शिवबा
शिवबा राजेंना हुकुमच भेटला होता
आईची आज्ञा शिरसावंद्य मानणारा राजा
इतक्यात
महालाचे पडदे बाजूला सारून एक धिप्पाड देहाचा माणूस आईसाब, राजं करीत आत आला. तो होता तान्हाजी मालुसरे. आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन तो आला होता.
" राजं आपली पायधूळ झाडायची पोराला सुनं ला आशीर्वाद द्याया यायचे राजं बरका आऊसाहेब"
पण दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्याचे तेज इतरवेळी सारखे नव्हतं. आणि तान्हाजीला हे लगेच जाणवलं. अहो जाणवणारच की बालपनाचं मैतर त्ये.
"राज काय झालं सगळी खैरीयत तर हाय न्हव.मी आल्या पासून बघतोय काय तरी लपवतायीसा ह्या तान्ह्या पासून"
" अरे काही नाही तान्या" "न्हाय कसं काय तरी हाय राजं आई तुळजा भवानीची शपत तुम्हास्नी काय त्ये बोला"
तान्ह्या आम्हीं कोंढाणा सर् करायला जाणार आहोत
"काय त्ये जमायचे न्हाय राजं कोंडण्यावर आन म्या कुठ घरी अजाबात न्हाय म्या जातो अन् कोंडाणा घेऊन येतो का आता आमच्या तलवारी वर तुमचा इस्वास न्हाय"
"तसं नाही तान्हाजी"
"अररं तान्ह्या येडा का खुळा तू घरी लगीन काढलंय, पै-पाहुण जमल्यात, अन्न रांदतय, दारात मांडव पडलाय, निविद दाखवलाय, औतन पोचल्यात अन् तू मोहिमेवर गेलास तर जग हसलं राजांवर वरबापाला काय तर मोहिमेवर धाडलाय"
"वा आईसाहेब कोपऱ्यापातूर वगळ यैस्तोवर आम्हीं भात आमटी वरपायची, नवीन शेलं पागोटं घालून मिरवायचं नाचायचं अन् आमचं राजं कुठ तर मोहिमवर आईसाब जग हसल आम्हास्नी श्यान घालल तोंडात"

"तान्ह्या आदी रायबाचं लगीन पार पाड" "नाही राजआधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं"
राजे हे काय पोर ऐकणाऱ्यातल न्हाय तुम्ही द्या याला मोहीम
आणि भांडून मोहिमेचे विडे घेऊन हा सिंह मोहिमेवर गेला गेला तो परत न येण्यासाठीचंशिवकाळात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व होते. मात्र किल्ले घेण्याच्या इस्लामी आणि शिवाजी राजांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. गतिमानता हा राजांच्या युद्धपद्धतीचा गाभा होता.पुरंदरच्या तहात गेलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोंढाणा होय. सिंहगड मोगलाकड़े होता.त्यावर उदयभानु राठोड या ३८ वर्षाच्या राजपूत किल्लेदाराची नेमणूक केली होती. त्याच्या हाताखाली सुमारे १५०० राजपूत आणि मुस्लिम सैनिक गडाच्या रक्षणासाठी तैनात केले होते..

राजांनी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती. तानाजीने पुरंदरचे युद्ध, प्रतापगडाचे युद्ध, राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती. तो हजार पायदळ हशमांचा सरदार होता. जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता. सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती. त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची (१६७०) संध्याकाळ. या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी. चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता. त्या आधी मिट्ट अंधारच...!!

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ्यासह राजगड सोडला. गुंजवणी नदी ओलांडली, सर्वजण विंडसई खिंडीत पोचले. तोपर्यंत अंधार पडला होता. मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते. अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले. दोन मावळ्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता. कमरेला दोर बांधून हे वीर झपाझप कडा वर चढून गेले. मात्र यावेळी कडा चढताना सहा मावळे कड्यावरुन पडून मरण पावले. त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.

कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले. दोराच्या आधाराने सारे मावळे वर आले अन घात झाला. उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय. एकच गोंधळ उडाला. चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता. गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले. काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले. थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जूंपला. मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते. साहजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता..

तानाजी व सुर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते. उदयभानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला. दोघानाही जखमा होत होत्या. उदयभानुच्या जोरकस वाराला अड़वण्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली..आता तानाजी उघडा पडला आणि उदयभानु जोशात आला. मर्मस्थानी वार बसून तानाजी घायाळ होवुन खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला... उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता. थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला..

तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चलबिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले.....विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यांनी शरणागती पत्करली......शेवटी काय???
गड आला पण सिंह गेला......


No comments:

Post a Comment