Friday, May 4, 2018

*हनुमान जयंती - छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी*

||श्री शिरायाय नमः||

दोन चिरंजीव. एकांची जयंती. एकांची पुण्यतिथी. एक जन्मतःच चिरंजीव. तर एकानी मृत्योत्तर चिरंजीवपदाचे अढळपद ध्रुवासारखे झळकत ठेवलेले. छत्रपति शिवाजी महाराज अवघ्या हिंदुहृदयावर निरंतर तेवत आहेत. अक्षूण्णपणे.

दोघांनिही सज्जनांचे रक्षण केले. राक्षसांचे निर्दालन केले. स्वधर्माची प्रतिष्ठापना केली. दोघांच्या वावरामध्ये मरूताचे सामर्थ्य होते. दोघांनीही भीम पराक्रम गाजवून आपली चरित्रे फुलवलेली.

हनुमंतांनी माता अंजनीच्या गर्भातून जन्म घेताच पाहिले ते सूर्य बिंब आणि त्याच्या दिशेने मार्गाक्रमण केले. शिवरायांनी देखील जन्म झाल्यानंतर आपली ध्येयनिश्चिती गाठण्यासाठी पराक्रमाचे उत्थान केले. दोघांचीही दिशा एकच होती. दोघांचेही स्वप्न एकच होते. त्यांना भगव्या रंगास कवटाळायचे होते. हनुमंतांना भगव्या सुर्यबिंबाला तर महाराजांना परमपवित्र भगव्या ध्वजाला.

दोघेही शोक हारीच आहेत. सौख्यकारीच आहेत. दोघेही पुण्यवंतच आहेत. पुण्यशिल आहेत. पावन आहेत. परितोशक आहेत. दोघांनीही आपल्या बाहुबळाने ध्वजांगे आवेशाने उचललेली आहेत. दोघेही जेव्हा पराक्रम गाजवीत होते तेव्हा काळाग्नी आणि कालरूद्र हे भयाने चळाचळा कापलेले आहेत. समरांगणात पराक्रम गाजविताना दोघांच्या दंतपंक्ती या आवेशाने आवळलेल्या गेलेल्या आहेत, नेत्रातून तेजाच्या अग्नीज्वाळा चाललेल्या आहेत, भृकुटी बळाने ताठरलेल्या आहेत. दोघांचेही चपळांग विद्युल्लतेसारखेच आहे. दोघांनिही चरित्रामध्ये संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत, व त्यांच्या उड्डाणाची दिशा देखील 'उत्तर' आहे. मग महाभारत कालीन इंद्रप्रस्थ असो किंवा शिवकालीन दिल्ली-आग्रा असो.

दोघांनी आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदलेले आहे. आणि अवघ्या हिंदुजातीला पराक्रमाचा अन् दहशतवादाला संपविण्याचा दिव्य मार्ग दाखवून दिलेला आहे.

No comments:

Post a Comment